वाशिम : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस, परिणामकारक आणि नियोजनबद्ध आराखडा राबविणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाने जिल्ह्यासाठी मंजूर केलेला निधी कोणत्याही परिस्थितीत व्यपगत होता कामा नये. तो वेळेत आणि योग्य विकासकामांसाठीच वापरला गेला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

वाशिम : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस, परिणामकारक आणि नियोजनबद्ध आराखडा राबविणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाने जिल्ह्यासाठी मंजूर केलेला निधी कोणत्याही परिस्थितीत व्यपगत होता कामा नये. तो वेळेत आणि योग्य विकासकामांसाठीच वापरला गेला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम येथे जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण आढावा सभा १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेत पालकमंत्री भरणे दुरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने काम केल्यास जिल्ह्यातील विकासकामांना निश्चितच गती मिळेल, असे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले. सभेला आमदार श्याम खोडे, आमदार सई डाहाके, विधानपरिषद सदस्य किरणराव सरनाईक, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक अनुज तारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, उपवनसंरक्षक अभिजीत वायकोस, परिविक्षाधीन भाप्रसे अधिकारी आकाश वर्मा, अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, सहाय्यक नियोजन अधिकारी संजय राठोड उपस्थित होते. खासदार संजय देशमुख व खासदार अनुप धोत्रे यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे सभेत सहभाग नोंदवला.
सभेदरम्यान जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांचा सविस्तर आढावा सादर केला. १४ ऑगस्ट रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती सभेच्या इतिवृत्तावरील कार्यवाहीचा अनुपालन अहवाल, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व ओटिएसपी) सन २०२६–२७ च्या प्रारूप आराखड्यास मान्यता तसेच सन २०२५–२६ मधील पुनर्विनियोजन प्रस्तावांवर सखोल चर्चा करण्यात आली.
