जालना : छत्रपती संभाजीनगरनंतर आता जालन्यातही भाजप आणि शिवसेना ( शिंदे गट ) यांची महायुती अखेर तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चांवर मंगळवारी पूर्णविराम लागला. भाजपने जालना महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला असून त्यामुळे आता जालन्यात भाजप, शिवसेना शिंदेगट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने उभे ठाकणार आहेत.

जालना : छत्रपती संभाजीनगरनंतर आता जालन्यातही भाजप आणि शिवसेना ( शिंदे गट ) यांची महायुती अखेर तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चांवर मंगळवारी पूर्णविराम लागला. भाजपने जालना महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केला असून त्यामुळे आता जालन्यात भाजप, शिवसेना शिंदेगट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने उभे ठाकणार आहेत.

भाजपचे नेते व माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पत्रकारांशी बोलताना युती तुटल्याची घोषणा केली. “जालना महापालिकेसाठी भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. युतीसंदर्भात अनेक फेऱ्यांच्या चर्चा झाल्या, मात्र त्या निष्फळ ठरल्या,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीतील तणाव याआधीच वाढलेला दिसून आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) याने काही दिवसांपूर्वीच जालना महापालिका निवडणुकीतून बाहेर पडत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर भाजप–शिवसेना युती टिकेल की नाही, याबाबत संभ्रम होता. अखेर मंगळवारी भाजपने स्वबळाचा निर्णय घेतल्याने महायुतीचा स्थानिक पातळीवर पूर्णत: भंग झाला आहे.
गोरंट्याल यांनी युती तुटण्यामागील कारणे स्पष्ट करताना सांगितले की, “जालन्यात भाजपला ३५ आणि शिवसेनेला ३० जागा देण्यावर प्राथमिक सहमती झाली होती. मात्र शिवसेनेने भाजपच्या वाट्यातील जागाही मागितल्या. ‘आम्हाला ३५ द्या, तुम्ही ३० घ्या,’ अशी अट घालण्यात आली. ही मागणी भाजपला मान्य होऊ शकली नाही.”
दरम्यान, २९ व्या जालना महापालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. ३ जानेवारी रोजी उमेदवारी अर्जांची अंतिम स्थिती स्पष्ट होणार असून, त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणूक चित्र समोर येईल. महायुती तुटल्यानंतर आता महाविकास आघाडी (काँग्रेस–राष्ट्रवादी शरद पवार गट–उद्धव ठाकरे गट) कोणती भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
युती तुटण्यामागची प्रमुख कारणे
जागावाटपावरून भाजप–शिवसेनेत तीव्र मतभेद
भाजपसाठी ठरलेल्या ३५ जागांवर शिवसेनेचा आक्षेप
राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आधीच निवडणुकीतून माघार
स्थानिक नेतृत्वामधील समन्वयाचा अभाव
महापालिका निवडणूक चित्र
राजकीय समीकरणे
भाजप : स्वबळावर निवडणूक लढवणार
शिवसेना (शिंदे गट) : स्वतंत्रपणे मैदानात
महाविकास आघाडी : निर्णय प्रतीक्षेत
३ जानेवारीनंतर स्पष्ट होणार अंतिम लढतीचे चित्र
