बुलढाणा : वामनदादा कर्डकांचं गाणं क्रांतीप्रवणतेचं गाणं आहे. वामनदादा आपल्या गाण्यातून जसे बाबासाहेब सांगतात तसेच कार्लमार्क्स, छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता जिजाऊ, महात्मा फुले, शाहू महाराज एवढेच नव्हेतर महात्मा गांधीही सांगतात. गाणं गाता गाता गाण्याचं रूपातर स्वत:मध्ये करणारे वामदादा एकमेव कवी होत.महाराष्ट्रात वेडयासारखे लोक त्यांच्या अवतीभोवती फिरायचे. त्यांच्या गाण्यांना तत्वज्ञानाचं चारित्र होतं, असे प्रतिपादन प्रख्यात लेखक, विचारवंत उत्तम कांबळे यांनी केले.

वामन दादांच्या गाण्यांना तत्वज्ञानाचं चारित्र होतं : उत्तम कांबळे
पृथ्वीराज चव्हाण / बुलढाणा : वामनदादा कर्डकांचं गाणं क्रांतीप्रवणतेचं गाणं आहे. वामनदादा आपल्या गाण्यातून जसे बाबासाहेब सांगतात तसेच कार्लमार्क्स, छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता जिजाऊ, महात्मा फुले, शाहू महाराज एवढेच नव्हेतर महात्मा गांधीही सांगतात. गाणं गाता गाता गाण्याचं रूपातर स्वत:मध्ये करणारे वामदादा एकमेव कवी होत.महाराष्ट्रात वेडयासारखे लोक त्यांच्या अवतीभोवती फिरायचे. त्यांच्या गाण्यांना तत्वज्ञानाचं चारित्र होतं, असे प्रतिपादन प्रख्यात लेखक, विचारवंत उत्तम कांबळे यांनी केले.
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ मुंबई यांच्या सौजन्याने लोककवी वामनदादा कर्डक बहुउद्देशीय प्रतिष्ठाण बुलढाणाच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी गर्दे वाचनालयाच्या सभागृहात दोन दिवशीय वामनदादा कर्डक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. चौदा सत्रात होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे उदघाटन शनिवारी प्रख्यात साहित्यिक, विचारवंत उत्तम कांबळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उदघाटनपर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी विचारपिठावर संमेलनाचे अध्यक्ष विलास सिंदगीकर, रमेश इंगळे उत्रादकर, मराठी साहित्य मंडळाचे आशुतोष पाटील, विजयालक्ष्मी वानखेडे, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर, आमदार संजय गायकवाड, सुरेश साबळे, भाऊ भोजणे, निमंत्रक सिध्दार्थ आराख यांच्यासह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना ते म्हणाले वामनदादांची गाणी संघर्षाच्या, त्यागाच्या व परिवर्तनाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघाली आहेत. त्यामुळं गाणं लोकाभिमुख करणारा, ते गाणं लोकांचंच करणारे वामनदादा एकमेव होते. वामनदादांचे शिक्षण काहीच नव्हते. बाबासाहेबांच्या सामाजिक क्रांतीच्या चळवळीने ते एवढे भारावले होते की, लिहायला, वाचायला येईल इतकेच शिक्षण घेऊन ते बाबासाहेबांचा विचार गावागावात पेरत गेले. वामनदादांच्या गाण्याला 1943 पासून सुरूवात झाली. त्यापूर्वी देशात 1942 चे चलेजाव आंदोलन झाले होते. बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांच्यातील पुणे करार झाला होता. राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली होती. काळाराम मंदीर सत्याग्रह झाला होता. त्यामुळे 1943 च्या पोटात काय काय दडले होते. त्या प्रत्येक प्रसंगावर वामनदादांनी गितांची पेरणी केली. त्यामुळे वामनदादा केवळ भीमशाहीर नव्हते तर ते क्रांती शाहीर होते. महाराष्ट्रात अनेकजणांनी वामनदादांवर पीएचडी केली असे सांगताना पीएचडी ही सो कॉल्ड विदवानांची भाषा आहे. आणि वामनदादांची भाषा फाटक्या, तुटक्या लोकांची..मात्र अत्यंत प्रभावी..वामनदादांनी ‘उध्दरली कोटी कुळे.. कशामुळे तर, भीमा तुझ्या जन्मामुळे’ हे तत्वज्ञान दोन ओळीत सांगितले. इतकी प्रचंड प्रतिभा त्यांच्या गाण्यात होती म्हणूनच त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावल्याचे ते म्हणाले.
