अंबड : आईच्या नावावर झालेला मृत्यूपत्राधारित जमीन फेर तात्काळ रद्द करण्याच्या मागणीवरून संतप्त झालेल्या शेतकऱ्याने थेट तलाठ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना अंबड येथे घडली.

अंबड : आईच्या नावावर झालेला मृत्यूपत्राधारित जमीन फेर तात्काळ रद्द करण्याच्या मागणीवरून संतप्त झालेल्या शेतकऱ्याने थेट तलाठ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना अंबड येथे घडली.
येथील तहसील कर्यालयात शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी हा धक्कादायक प्रकार घडला. चंदनापुरी सजा येथील तलाठी पवन तुपकर यांच्यावर भांभेरी येथील शेतकरी संजय बापुराव कणके यांनी कार्यालयातच हात उगारल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय कणके यांच्या आई ताराबाई कणके यांच्या मृत्यूपत्राच्या आधारे जमिनीचा फेर करण्यात आला होता. हा फेर तत्काळ रद्द करावा, अशी मागणी कणके यांनी तलाठी तुपकर यांच्याकडे केली. मात्र, फेर रद्द करण्याचा अधिकार मंडळ अधिकाऱ्यांचा असल्याचे तलाठ्यांनी स्पष्ट केल्याने दोघांमध्ये वाद निर्माण झाला. हा वाद तीव्र होताच रागाच्या भरात शेतकऱ्याने तलाठ्याच्या कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. तसेच तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी तलाठी पवन तुपकर यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हेड कॉन्स्टेबल अलका केंद्रे पुढील तपास करीत आहेत.
