जालना : नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेत जालना जिल्ह्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केलेल्या तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण यांच्यासह 7 अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश गवळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

विनोद काळे / जालना : नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेत जालना जिल्ह्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार केलेल्या तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण यांच्यासह 7 अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश गवळी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

सुरेश गवळी यांनी सोमवार, 15 डिसेंबर रोजी मंत्रालयात दिलेल्या तक्रारीनुसार, पोकरा योजनेतून जालना जिल्ह्यात जुलै ते सप्टेंबर 2023 मध्ये शेडनेट उभारणी या घटकात पुणे येथील कृषी आयुक्तालयाच्या दक्षता पथकाने सुरेश गवळी यांच्या तक्रारीनंतर चौकशी केली होती. त्यात तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण या दोषी आढळून आल्या होती. त्यामुळे त्यांच्यावर 56 लाख 77 हजार रुपयांची वसूलपात्र रक्कम निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या लेखापरीक्षणात 1056 प्रकरणात अनुदान अदा करण्यात अनियमितता आढळून आली होती. त्यात तब्बल 2 कोटी 51 लक्ष 46 हजार 634 रुपयांची अनियमितता समोर आली. त्यामुळे ही रक्कम दोषी अधिकारी शीतल चव्हाण, रामेश्वर भुते, व्यंकट ठक्के यांच्यासह इतर चार जणांकडून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. याशिवाय 23 सप्टेंबर 2024 रोजी शासनाकडून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, यामध्ये वरिष्ठ पातळीवरून या दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप गवळी यांनी या तक्रारीत केला आहे.

दरम्यान, 5 डिसेंबर रोजी शासनाने दिलेल्या पत्रानुसार या दोषींमधील तत्कालीन लेखाधिकारी सुभाष यशवंतकर, आकाश टाक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत जालन्याचे उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत पवार यांनी सदर बाजार पोलिसांत पत्र दिलेले आहे. मात्र, अद्यापही या प्रकरणी गुन्हा दाखल केला जात नाही. या घोटाळ्यात दोषी असलेल्या शीतल चव्हाण आणि इतर सहा जणांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावे, अन्यथा मला न्यायालयीन लढाई करावी लागेल, असा इशारा सुरेश गवळी यांनी दिला आहे.
शासनाच्या निर्देशानुसार कारवाई
पोकरा योजनेतील अनियमितता प्रकरणी शासनाच्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. यातील इतर अधिकारी, कर्मचारी यांच्या संबंधीच्या सूचना अजून प्राप्त नाहीत.
» वानखेडे,सह कृषी संचालक,
छत्रपती संभाजीनगर.
रक्कम वसूल करा
जालना जिल्ह्यात पोकरा योजनेत सर्वाधिक दोषी तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण, रामेश्वर भुते, व्यंकट ठक्के हे असून यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कृषी विभागाने या सर्वांवर गुन्हे दाखल करून रक्कम वसूल करावी.
» सुरेश गवळी, प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस.
‘महाभूमि’ मुळे प्रशासनाला जाग
जालना जिल्ह्यातील पोकरा योजनेतील या घोटाळ्याबाबत
‘दैनिक महाभूमि’ ने शासनाच्या ढीम्म कारभारावर ताशेरे ओढून हा गैरप्रकार चव्हाट्यावर आणला. त्यामुळे मागच्या वर्षी तत्कालीन उपविभागीय अधिकारी शीतल चव्हाण यांना निलंबित करण्यात आले होते.
