नांदुरा : तेलंगाणा येथील दाम्पत्य जळगाव खान्देश येथे लग्नसमारंभासाठी जात असतांना नांदुरा-मलकापूर मार्गावरील वडनेर मार्गाजवळ विरूध्द दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने सदर दाम्पत्याच्या कारला कट मारल्याने सदर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या पडीत विहिरीमध्ये जावून पडल्याची बाब सीसीटिव्ही फुटेजमुळे समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नांदुरा : तेलंगाणा येथील दाम्पत्य जळगाव खान्देश येथे लग्नसमारंभासाठी जात असतांना नांदुरा-मलकापूर मार्गावरील वडनेर मार्गाजवळ विरूध्द दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने सदर दाम्पत्याच्या कारला कट मारल्याने सदर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या पडीत विहिरीमध्ये जावून पडल्याची बाब सीसीटिव्ही फुटेजमुळे समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव खान्देशातील पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा येथील पद्मसिंग दामू पाटील (49) व नम्रता पद्मसिंग पाटील (45) हे तेलंगणाहून मुळगावी परतत होते. मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील वडनेर भोलजी शिवारात 27 नोव्हेंबर रोजी त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. कार महामार्गालगतच्या विहिरीत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. दाम्पत्य बेपत्ता झाल्याची नोंद होताच मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवण्यात आली. मोबाइल लोकेशनच्या आधारे परिसरात शोध घेताना वडनेर शिवारातील विहिरीत कार आढळून आली. त्यानंतर हॉटेल विश्वगंगा येथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता अज्ञात वाहनचालकाने पाटील दाम्पत्याच्या कारला कट मारल्याचे दिसून आले. अचानक विरूध्द दिशेने कार येवून कट लागल्याने पद्मसिंग पाटील यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट विहिरीत कोसळली. या फुटेजच्या आधारे आणि संदीप पाटील यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय पवार करीत आहेत.
