लातूर : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे शुक्रवारी सकाळी लातूर या त्यांच्या मूळ गावी निधन झाले.

लातूर : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे शुक्रवारी सकाळी लातूर या त्यांच्या मूळ गावी निधन झाले.
पाटील काही काळापासून आजारी होते आणि त्यांनी देवघर येथील त्यांच्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला, असे कुटुंबीय सूत्रांनी सांगितले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबात मुलगा शैलेश पाटील, सून अर्चना आणि दोन नातवंडे आहेत. त्यांच्या सुनेने भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर काँग्रेसच्या अमित देशमुख यांच्या विरोधात लातूर शहर निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला. १२ ऑक्टोबर १९३५ रोजी जन्मलेले पाटील यांनी १९६६ ते १९७० दरम्यान लातूर नगर परिषदेचे प्रमुख म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर ते दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले. १९७७ ते १९७९ दरम्यान त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत उपसभापती आणि सभापतींसह अनेक महत्त्वाची पदे भूषवली. त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून सात वेळा विजय मिळवला आणि १९९१ ते १९९६ पर्यंत लोकसभेचे १० वे सभापती म्हणून काम पाहिले. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत ते भाजपच्या रुपाताई पाटील निलंगेकर यांच्याकडून पराभूत झाले. ते राज्यसभेचे सदस्य देखील होते.
