छत्रपती संभाजीनगर : केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून मराठा समाजावर अन्याय केला जात असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवार, 1 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत केला. तसेच मराठा आंदोलनाबाबत राज्यसरकार गंभीर नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर : केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून मराठा समाजावर अन्याय केला जात असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवार, 1 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत केला. तसेच मराठा आंदोलनाबाबत राज्यसरकार गंभीर नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो मराठा समाज बांधव मुंबईत दाखल झाल्यामुळे मुंबई जाम झाली असल्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत आहे, केंद्रात देखील बहुमत आहेत त्यामुळे त्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांचा आदर करुन मराठा आरक्षण मंजूर करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याऐवजी भाजपचे नेते महाराष्ट्रात असंतोष निर्माण करीत असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले आहेत. न्यायालयाने आझाद मैदानावर पाच हजार आंदोलकांना येण्याची मर्यादा घातली आहे. त्यामुळे मराठा आंदोलक मुंबईत विखुरले आहेत. शासनाने आझाद मैदानावरील आंदोलकांची मर्यादा रद्द केल्यास सर्व आंदोलक आझाद मैदानावर जमतील असा विश्वासही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे.
