मुंबई : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत नियुक्त झालेले आणि त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने २८ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबईतील बैठकीत सर्व संघटनांचा निर्धार
मुंबई : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत नियुक्त झालेले आणि त्यानंतर शंभर टक्के अनुदानावर आलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या वतीने २८ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय सहविचार सभा मुंबई येथे संपन्न झाली. विविध समित्यांचे अहवाल झाले, सभागृहात घोषणा झाली पण प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही. म्हणून जुन्या पेन्शनचा शासन निर्णय हातात येईपर्यंत पेन्शन पीडित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आझाद मैदानावर ठाण मांडून बसणार आहेत, अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी दिली.
या सभेमध्ये राज्यातील पेन्शनपीडित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाकडे सातत्याने मांडण्यात येत असलेली जुनी पेन्शन योजनेची मागणी, संबंधित कर्मचाऱ्यांची सेवा पार्श्वभूमी, न्यायालयीन लढा तसेच शासनस्तरावरील प्रलंबित प्रश्न याबाबत पदाधिकाऱ्यांनी आपापली मते मांडली. २००५ पूर्वी नियुक्ती होऊन त्यानंतर शंभर टक्के अनुदान प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन प्रश्नावर राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी संघटनेची मागणी आहे.
आंदोलनाच्या पुढील टप्प्याचे नियोजन…
जिल्हानिहाय जबाबदाऱ्या, आंदोलकांची उपस्थिती, मुंबईतील आंदोलनाची व्यवस्था आणि राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी करून घेण्याबाबत सभेत सविस्तर नियोजन करण्यात आले आहे.
उपस्थित राहण्याचे आवाहन
२८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील सर्व जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आपल्या मागणीची तीव्रता शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
मूक मोर्चाचा इशारा
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये यापूर्वी काळ्या फिती लावून काम करणे, मूक मोर्चे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत निवेदने देऊन आंदोलनाची पार्श्वभूमी तयार करण्यात आली आहे. २५ सप्टेंबरपर्यंत शासनाने ठोस निर्णय न घेतल्यास २८ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

