२९ ऑगस्टच्या उपोषणासाठी तयारीचे आवाहन
“दौऱ्यासाठी जी ताकद, मेहनत आणि तयारी आपण करत होतो, तीच ताकद आता २९ तारखेच्या उपोषणासाठी लावा. गावागावात जाऊन समाजबांधवांशी संवाद साधा, प्रत्येक गाव सज्ज करा,” असे आवाहन मनोज जरांगे पाटील त्यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगर : तब्येतीच्या कारणास्तव संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा नियोजित मराठवाडा दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र, दौरा रद्द झाला असला तरी आंदोलन थांबलेले नसून २९ ऑगस्टपासून आंतरवाली सराटी येथे होणाऱ्या उपोषणाची तयारी गावागावात जोमाने करण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना केले आहे.
“दौऱ्यासाठी जी ताकद, मेहनत आणि तयारी आपण करत होतो, तीच ताकद आता २९ तारखेच्या उपोषणाच्या तयारीसाठी लावा. गावागावात जाऊन समाजबांधवांशी संवाद साधा आणि प्रत्येक गाव २९ तारखेच्या उपोषणासाठी सज्ज करा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.
“दौरा रद्द झाला, पण संघर्ष थांबलेला नाही,” असा संदेश देत जरांगे पाटील यांनी मराठा समाजबांधवांनी गावपातळीवर तयारीला लागण्याचे आवाहन केले.

कुणबी प्रमाणपत्रांबाबतच्या मागण्या, मराठा समाजाच्या ५० लाख नोंदींचे रेकॉर्ड उपलब्ध करून देणे यासह विविध मागण्यांसाठी जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून आंतरवाली सराटी येथे उपोषण करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला असून, पुढील टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भ दौरा प्रस्तावित होता.
मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव मराठवाडा दौरा रद्द झाल्याने आता या दौऱ्यासाठी करण्यात आलेली तयारी आणि मनुष्यबळ २९ ऑगस्टच्या उपोषणाच्या नियोजनासाठी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मराठवाड्यात गावागावांत बैठका आणि जनजागृतीवर भर दिला जाण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्ये उपोषण सुरूच
एकीकडे कुणबी प्रमाणपत्रासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाची तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे शाश्वत आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे राजेंद्र दाते पाटील उपोषण करीत आहेत. या दोन्ही मागण्या भिंत असल्याने समाजात मराठा आरक्षणाबाबत संभ्रम निर्माण होत आहे.
