वाशिम : एकीकडे नातेवाईकांकडील लग्नाची लगबग, मनात उत्साह आणि आनंदाचे वातावरण असतानाच, वाशिम जिल्ह्यातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मंगरुळपीर ते वाशिम रोडवरील पार्डी टकमोर (बिटोडा तेली) फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला.

वाशिम : एकीकडे नातेवाईकांकडील लग्नाची लगबग, मनात उत्साह आणि आनंदाचे वातावरण असतानाच, वाशिम जिल्ह्यातून एक अत्यंत सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मंगरुळपीर ते वाशिम रोडवरील पार्डी टकमोर (बिटोडा तेली) फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. उद्या सकाळी होणाऱ्या लग्नासाठी आनंदाने निघालेल्या या कुटुंबाला वाटेतच मृत्यूने गाठले.
मिळालेल्या माहितीनुसार, वारा जहागीर येथील रहिवासी संतोष बबन लांभाडे (४२), त्यांच्या पत्नी कलावती संतोष लांभाडे (३५) आणि मुलगा ईश्वर संतोष लांभाडे (१२) हे तिघे आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी तांदळी शेवई येथे जात होते. उद्या सकाळी या लग्नाचा मुख्य सोहळा पार पडणार होता. मात्र, घरापासून निघालेल्या या कुटुंबाचा प्रवास अर्ध्यावरच रक्ताने माखला. ५:३० ते ५:४५ वाजेच्या सुमारास पार्डी टकमोर फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला आंब्याने भरलेल्या भरधाव पिकअप वाहनाने समोरून जोराची धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील लांभाडे दांपत्य आणि त्यांचा १२ वर्षांचा मुलगा ईश्वर हे तिघेही रस्त्यावर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्याने या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. काही वेळापूर्वी घराबाहेर पडताना लग्नाच्या उत्साहात असलेल्या या कुटुंबाचा असा भीषण अंत पाहून प्रत्यक्षदर्शींचेही काळीज हेलावले.


