मधमाशांच्या हल्ल्याने लग्न समारंभ उधळला; सहाजण गंभीर

मलकापूर :  लग्नात विघ्न या उक्तीप्रमाणे शुभकार्यात कधी अडथळा येईल, हे सांगता येत नाही. असाच प्रसंग 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिरात घडला. हळदीचा समारंभ सुरू असतानाच मधमाशांनी वऱ्हाडी मंडळीवर अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यामुळे हळदीचा कार्यक्रम अर्धवट सोडावा लागला. या घटनेत सहा जण गंभीररित्या जखमी झाले आहे.

मलकापूर :  लग्नात विघ्न या उक्तीप्रमाणे शुभकार्यात कधी अडथळा येईल, हे सांगता येत नाही. असाच प्रसंग 8 मार्च रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास अनुराबाद येथील सोमेश्वर मंदिरात घडला. हळदीचा समारंभ सुरू असतानाच मधमाशांनी वऱ्हाडी मंडळीवर अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यामुळे हळदीचा कार्यक्रम अर्धवट सोडावा लागला. या घटनेत सहा जण गंभीररित्या जखमी झाले आहे.

तालुक्यातील धरणगाव येथील अर्जुन नामदेव चौधरी यांचे चिरंजीव रूपेश यांचा विवाह दाभाडी येथील राजेंद्र सोपान चोपडे यांची कन्या कामिनी हिच्यासोबत 8 मार्च रोजी सोमेश्वर मंदिरात ठरला होता. हळदीच्या कार्यक्रमासाठी निवडक वऱ्हाडी मंडळी, विशेषतः महिला, विवाहस्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि हळदी समारंभात व्यत्यय आला. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष उमाकांत चौधरी व सरपंच ज्ञानदेव ढगे यांच्यासह गावकऱ्यांनी तत्काळ मदत करत जखमींना उपचारासाठी मलकापूर येथे हलविले. सोमेश्वर मंदिरात हळदीच्या समारंभात झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने पुढाकार घेतला. विवाह कार्यात अडथळा येऊ नये, याकरिता सर्व साहित्य व वरातींना धरणगाव येथे हलवण्यात आले आणि दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास विवाह विधी पार पडला.

मुलगा बोहल्यावर, वडील सलाईनवर!

या हल्ल्यामुळे विवाह थांबेल का, असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र नववधूच्या कुटुंबाने विवाह पार पाडण्याचा निर्णय घेतला. परिणामी, नवरदेव बोहल्यावर, तर त्याचे वडील रुग्णालयात होते. त्यांच्यासह गंभीर जखमींमध्ये रामकृष्ण हरी पाटील (70), रवींद्र हरी पाटील (65), अर्जुन नामदेव चौधरी (60), सुशीलाबाई पुंजाजी चौधरी (70), ज्योत्स्ना नारखेडे (32), मनीषा विजय नारखेडे (29) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यापैकी तीन जणांवर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत.

जखमींच्या शरीरातून दोन हजाराचे वर काटे काढले !

सोमेश्वर मंदिरात मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या एकाच्या शरीरातून तब्बल दोन हजाराचेवर काटे डॉक्टरांनी काढल्याची माहिती नातेवाईकांनी दिली, तसेच इतर सर्व जखमींच्या शरीरातूनही कमी-जास्त प्रमाणात काटे काढण्यात आले. यावरून हल्ल्याची तीव्रता स्पष्ट होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »