मालेगाव : लेकीच्या विवाहासाठी बस्ता बांधण्याच्या तयारीत असलेल्या एका पित्याने अचानक जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथे शनिवारी (दि. २१ फेब्रुवारी) उघडकीस आली. राजू हरिभाऊ कालापाड (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मालेगाव : लेकीच्या विवाहासाठी बस्ता बांधण्याच्या तयारीत असलेल्या एका पित्याने अचानक जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथे शनिवारी (दि. २१ फेब्रुवारी) उघडकीस आली. राजू हरिभाऊ कालापाड (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
राजू कालापाड यांची मुलगी पूनम हिचा विवाह १४ मार्च २०२६ रोजी ठरला होता. ग्रामीण परंपरेनुसार लग्नापूर्वी दागिने व कपड्यांची खरेदी करण्यासाठी नातेवाईकांना सोबत नेण्याची तयारी सुरू होती. त्यासाठी २० फेब्रुवारी रोजी राजु यांनी स्वतः गावातील भाऊकीत घरोघरी जाऊन ‘उद्या लेकीच्या लग्नासाठी खरेदीला जायचे आहे, सर्वांनी सोबत या,’ असे आवाहन केले होते. बहुतांश नातेवाईकांना निमंत्रणही दिले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी सुमारे ९.३० वाजता त्यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेतल्याचे आढळून आले. कालपर्यंत आनंदाच्या तयारीत सहभागी होण्यासाठी बोलावलेले नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी एकत्र जमल्याने संपूर्ण गावात शोकमय वातावरण निर्माण झाले.
आर्थिक अडचणींचा ताण कारणीभूत?
राजू कालापाड यांच्याकडे दोन एकर वडिलोपार्जित जमीन होती. भावंडांतील वाटणीनंतर अल्प भूभागावर शेती करणे कठीण झाल्याने ते मोलमजुरी करून कुटुंब चालवत होते. मुलीचे लग्न सन्मानाने पार पाडण्याचा आर्थिक ताण त्यांना असह्य झाला असावा, अशी चर्चा परिसरात होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी उषा, दोन मुले पवन व अक्षर आणि मुलगी पूनम असा परिवार आहे. मालेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून घटनेचा तपास सुरू केला आहे.
