मानोरा : संत सेवालाल महाराज यांनी समाजाला स्वाभिमान, सदाचार आणि सेवाभावाचा मार्ग दाखविला. त्यांचे विचार आजच्या काळात अधिक प्रेरणादायी आहेत. पोहरादेवी हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. पर्यटन विकास हा केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित नसतो, तर तो स्थानिक संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचे संवर्धन करणारा असतो. पोहरादेवी परिसराचा नियोजनबद्ध विकास करताना श्रद्धेचा सन्मान राखून सुविधा अधिक सक्षम करण्यात येईल. बंजारा समाजाच्या कायम पाठीशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पोहरादेवीत उद्योग निर्मितीला चालना देणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मानोरा : संत सेवालाल महाराज यांनी समाजाला स्वाभिमान, सदाचार आणि सेवाभावाचा मार्ग दाखविला. त्यांचे विचार आजच्या काळात अधिक प्रेरणादायी आहेत. पोहरादेवी हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून, सामाजिक ऐक्य आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. पर्यटन विकास हा केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित नसतो, तर तो स्थानिक संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचे संवर्धन करणारा असतो. पोहरादेवी परिसराचा नियोजनबद्ध विकास करताना श्रद्धेचा सन्मान राखून सुविधा अधिक सक्षम करण्यात येईल. बंजारा समाजाच्या कायम पाठीशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दृरदृश्यप्रणालीव्दारे संदेश देतांना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार संजय देशमुख, आमदार धर्मगुरू बाबुसिंग महाराज, आमदार किरण सरनाईक, आ.सई डाहाके, आ.राजेश राठोड , आ.किसन वानखडे, पुसदच्या नगराध्यक्षा मोहिनी नाईक, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, पर्यटन उपसंचालक विजय जाधव, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, संत सेवालाल महाराज यांचे विचार समाजात समता, बंधुता आणि सेवाभाव रुजवणारे आहेत. पोहरादेवी हे केवळ धार्मिक स्थळ नसून, पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठी क्षमता असलेले केंद्र आहे. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आवश्यक त्या पायाभूत सुविधा, रस्ते, निवास व पर्यटक सुविधांसाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे.संत सेवालाल महाराज यांचा वारसा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पोहरादेवीसारख्या तीर्थक्षेत्रांचा विकास झाला, तर स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. शासन विकास आणि सामाजिक समरसतेसाठी कटिबद्ध आहे.पोहरादेवीत उद्योग निर्मितीला चालना देणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी प्रास्ताविकात पर्यटन महोत्सवाची रूपरेषा स्पष्ट करत पोहरादेवीच्या विकासासाठी शासनाचे भक्कम पाठबळ मिळत असल्याचे सांगितले. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून संत सेवालाल महाराज यांच्या विचारांवर समाजाची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. जयंती शासन स्तरावर साजरी केली जात असल्याने विकासकामांना गती मिळत असून ‘बंजारा काशी’ परिवर्तनाच्या दिशेने पुढे जात असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संत सेवालाल महाराज यांचे नाव देण्याबाबत शासनाचे आभार व्यक्त केले. महंत जितेंद्र महाराज यांनी मनोगतात संत सेवालाल महाराज यांनी समाजाला शांती व सद्भावनेचा संदेश दिल्याचे सांगत बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याची गरज व्यक्त केली. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सवामुळे पोहरादेवीचा राज्यपातळीवर नावलौकिक वाढत असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांतून युवा पिढीला आपली संस्कृती व परंपरा समजते, असे नमूद करत शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. पोहरादेवीला जोडणाऱ्या विकासकामांची माहिती देत पर्यटन राज्यमंत्री म्हणून परिसराच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
