अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार आशिष पैठणकर या आरोपील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. मागील पाच महिन्यांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. या प्रकरणात आतापर्यंत 32 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पैठणकरच्या अटकेमुळे महत्वाचे खुलासे होणार असून आणखी काही बडे मासे पोलिसांच्या गळाला लागणार आहे.

अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्ती अनुदान घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार आशिष पैठणकर या आरोपील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. मागील पाच महिन्यांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. या प्रकरणात आतापर्यंत 32 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पैठणकरच्या अटकेमुळे महत्वाचे खुलासे होणार असून आणखी काही बडे मासे पोलिसांच्या गळाला लागणार आहे.
शासनाने नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून कोट्यावधी रुपयांचे अनुदान मंजूर केले होते. दरम्यान बोगस याद्या तयार करून या अनुदान वाटपात अपहार झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर 240 गावांमधील या अनुदान वाटपात तब्बल 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा अपहार झाल्याचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यानंतर याप्रकरणात मंडळ अधिकारी, 22 तलाठी व कर्मचाऱ्यांसह 28 जणांविरूध्द अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते. तेव्हापासून पोलीस या आरोपींचा शोध घेत होते. यातील 31 आरोपींना पोलीसांनी यापुर्वीच अटक केली होती. या प्रकरणातील फरार आरोपी जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात दाद मागत होते. परंतु न्यायालयाने या आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले. मागील पाच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा घनसावंगी तहसील कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी आशिष प्रमोदकुमार पैठणकर, (45 ) रा. परतूर याच्या मुस्क्या आवळण्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंन्सल, अपर अधीक्षक आयुष नोपाणी, उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा सिध्दार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, गोकुळसींग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे, विष्णु कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रविंद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर, महिला अंमलदार जया निकम, निमा घनघाव, मंदा नाटकर यांनी केली.
