वाशिम : एकाच दिवशी तब्बल ६७० वाद सामोपचाराने मिटवत राष्ट्रीय लोक अदालतीने न्यायदानाचा वेगवान व प्रभावी अनुभव दिला. या लोक अदालतीतून जिल्ह्यात एकूण ३ कोटी ८७ लाख रुपयांचा आर्थिक समझोता साध्य झाल्याने न्यायालयांवरील प्रलंबित प्रकरणांचा भार मोठ्या प्रमाणात कमी झाला.

वाशिम : एकाच दिवशी तब्बल ६७० वाद सामोपचाराने मिटवत राष्ट्रीय लोक अदालतीने न्यायदानाचा वेगवान व प्रभावी अनुभव दिला. या लोक अदालतीतून जिल्ह्यात एकूण ३ कोटी ८७ लाख रुपयांचा आर्थिक समझोता साध्य झाल्याने न्यायालयांवरील प्रलंबित प्रकरणांचा भार मोठ्या प्रमाणात कमी झाला.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार शनिवार, १३ डिसेंबर रोजी वाशिम जिल्ह्यातील जिल्हा न्यायालयासह सर्व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत निपटारा सुरु होता. या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे पालक न्यायमूर्ती तथा वाशिम जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती एम. एम. नेरलीकर यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी बोलताना न्यायमूर्ती नेरलीकर यांनी न्यायालयात प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणांतील पक्षकारांनी आपले वाद सामोपचाराने व कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी लोक अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. लोक अदालतीमुळे वेळ, खर्च आणि मानसिक तणाव वाचत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वाशिम अनिल सुब्रमण्यम यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याचे आवाहन केले. अध्यक्ष, जिल्हा विधीज्ञ मंडळ वाशिम अनुप बाकलीवाल यांनीही लोक अदालतीचे महत्त्व अधोरेखित करत अधिकाधिक प्रकरणे सामोपचाराने मिटविण्याचे आवाहन केले. या राष्ट्रीय लोक अदालतीत वाशिम जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली ४,६४७ प्रकरणे तसेच दाखलपूर्व ९,११५ प्रकरणे विचारार्थ ठेवण्यात आली होती. यापैकी प्रलंबित व दाखलपूर्व अशी मिळून एकूण ६७० प्रकरणे एकाच दिवशी सामोपचाराने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांतून एकूण ३ कोटी ८७ लाख ८८ हजार ४१२ रुपये इतक्या रकमेचा निपटारा करण्यात आला.
