मुंबई : महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई : महाराष्ट्र आणि जपानच्या वाकायामा प्रांतामधील संबंध मैत्रीपूर्ण आहेत. तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवा उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून हे संबंध येणाऱ्या काळात अधिक दृढ करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक मजबूत करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह हॉटेल ताजमहल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी, वाकायामा विधानसभेचे उपाध्यक्ष अकिझुकी फुमिनारी यांच्यासह जपानचे शासन, विधिमंडळ, सांस्कृतिक, क्रीडा, उद्योग आदी विविध क्षेत्रातील प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई ही भारताची आर्थिक, व्यावसायिक, सांस्कृतिक आणि मनोरंजन व्यवसायाची राजधानी आहे. ‘सिस्टर स्टेट’ असलेल्या महाराष्ट्राचे आणि वाकायामा प्रांताचे अनेक वर्षांपासून मैत्रीचे संबंध आहेत. महाराष्ट्र आणि वाकायामा प्रांतादरम्यान 2013 मध्ये सहकार्याचा सामंजस्य करार झाला होता आणि 2023 मध्ये त्याचे नूतनीकरण करण्यात आले. या कालावधीत दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक, क्रीडा, पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय देवाणघेवाण झाली आहे. वाकायामा प्रांताच्या सहकार्याने जपानी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून अजिंठा परिसरातही जपानी पर्यटकांसाठी सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
नागपूर येथे बामियानच्या बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारणार
अफगाणिस्तानातील बामियानच्या गौतम बुद्धांच्या पुतळ्याच्या विध्वंसाला 25 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथे त्या पुतळ्याची प्रतिकृती उभारण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांना दिला. नागपूर शहर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारून पुनरुज्जीवन घडवून आणलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. या उपक्रमातून जगाला शांततेचा संदेश जाईल आणि भारत-जपान मैत्रीचे प्रतीक निर्माण होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
महाराष्ट्र-वाकायामा संबंध नव्या उंचीवर नेणार : मियाझाकी इजुमी
महाराष्ट्र आणि वाकायामा दरम्यान कराराचे 2028 मध्ये नूतनीकरण करून नवनवीन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा मानस वाकायामाचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी व्यक्त केला. ‘वाकायामा हे जपानमधील महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे’ असे सांगून महाराष्ट्र-वाकायामा मधील संबंध नव्या उंचीवर जातील, असे त्यांनी सांगितले.
