अकोलादेव : अंबड तालुक्यातील मढी येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या दोन तरुणांच्या कारला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. हा भीषण अपघात जालना ते बीड महामार्गावरील अंबड शहराजवळ रविवार, 28 जून रोजी सकाळी घडला.

अकोलादेव : अंबड तालुक्यातील मढी येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या दोन तरुणांच्या कारला समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेत दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. हा भीषण अपघात जालना ते बीड महामार्गावरील अंबड शहराजवळ रविवार, 28 जून रोजी सकाळी घडला. या अपघातामुळे जाफ्राबाद तालुक्यातील कुंभारझरी गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास दगडोबा चव्हाण (24 वर्ष), सागर दिपक बर्डे (24 वर्ष), दोघे रा. कुंभारझरी, ता. जाफ्राबाद असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत. विकास चव्हाण आणि सागर बर्डे हे दोघेही रविवारी पहाटे मढी येथे देवदर्शनासाठी जाण्यासाठी आपल्या कारने अंबडकडे जात होते. अंबड शहराजवळ त्यांच्या कारला समोरुन येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्हीही तरुण कारमध्ये अडकून पडले होते. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी आणि महामार्गावरील वाहनधारकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने विकास चव्हाण, सागर बर्डे यांना बेशुध्दावस्थेत कारमधून बाहेर काढून उपचारासाठी अंबड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केले. उत्तरिय तपासणीसाठी दोन्ही तरुणांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविले असल्याचे अंबड पोलिसांनी सांगितले. या अपघाताची नोंद अंबड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.


