जालना : कामगार विरोधी धोरणांविरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन जालना जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली गुरुवार, 12 फेब्रुवारी रोजी जोरदार आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कामगार, आशा वर्कर्स, गटप्रवर्तक तसेच महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांनी आंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल दीड तास रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

जालना : कामगार विरोधी धोरणांविरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन जालना जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली गुरुवार, 12 फेब्रुवारी रोजी जोरदार आंदोलन करण्यात आले. अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कामगार, आशा वर्कर्स, गटप्रवर्तक तसेच महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांनी आंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल दीड तास रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
रस्ता रोको आंदोलनाचे जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ कामगार नेते अण्णा सावंत, मधुकर मोकळे, अनिल मिसाळ, कांचन वाहुळे, दीपा रगडे, सुजाता छडीदार, कृष्णा काटकर, वैजनाथ लोंढे यांनी केले.
सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका
यावेळी बोलताना नेत्यांनी चार नवीन श्रम संहिता (श्रमशक्ती नीती – २०२५) या कामगार विरोधी असल्याचा आरोप करत त्या तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी केली. गेल्या शंभर वर्षांच्या संघर्षातून मिळवलेले कामगारांचे लोकशाही हक्क संपवून सरकार मालकधार्जिणी धोरणे राबवत असल्याची टीका करण्यात आली. या धोरणांमुळे कामगार संघटनांचे अस्तित्व धोक्यात येणार असून, देश हुकूमशाहीकडे वाटचाल करत असल्याचा गंभीर इशाराही देण्यात आला.
राष्ट्रपतींना निवेदन
या आंदोलनानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन सादर केले. निवेदनात चार श्रम संहिता रद्द करून पूर्वीचे कामगार कायदे पुन्हा लागू करावेत व त्यांची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनात बाबासाहेब पाटोळे, लक्ष्मण मोहिते, यशोदा गिरी, सुनंदा पवार, मथुरा रत्नपारखे, सुलभा पवार, हरिश्चंद्र लोखंडे, संतोष पाटोळे, उषा बनकर, यशोदा देशमुख, यादव डिघे, युनूस पठाण, प्रियांका राठोड, लता वीर, सावित्री इस्तापी, संगीता पगडे, गायत्री ठाकूर, अरुणा बांगर, गोविंद चांदगुडे, मीरा पुंगळे, आशा मिसाळ, संगीता साळवे, अब्दुल पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार सहभागी झाले होते.
या आहेत प्रमुख मागण्या
▪ चार नवीन श्रम संहिता रद्द करून जुन्या कामगार कायद्यांची पुनर्स्थापना
▪ कंत्राटी, हंगामी, रोजंदारी व मानधनावरील कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण
▪ समान कामासाठी समान वेतनाची अंमलबजावणी
▪ ८ तासांच्या कामासाठी दरमहा ३० हजार रुपये किमान वेतन
▪ सर्व ज्येष्ठ नागरिकांना १० हजार रुपये मासिक पेन्शन
▪ असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी स्वतंत्र सर्वसमावेशक कायदा
▪ बेरोजगारांना नोकरी किंवा जगण्यालायक भत्ता
▪ सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांचे खाजगीकरण तात्काळ थांबवावे
▪ आशा, अंगणवाडी, पोषण आहार कामगारांचे नियमितीकरण व सामाजिक सुरक्षा
▪ महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करावा.
